Last Updated:
Shiv Sena Shinde : मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईतच ठाकरे गटाविरुद्धच्या लढतीत शिंदे गटाला धक्का बसला होता. आता आगामी २०२९ च्या निवडणुकीत या पराभवांची परतफेड करण्यासाठी शिंदे गट तयारीला लागला आहे.

मुंबई: राज्यातील निवडणुकांचे रणांगण सध्या शांत झाल्याचे चित्र आहे. काही राजकीय पक्षांनी २०२९ मधील आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईतच ठाकरे गटाविरुद्धच्या लढतीत शिंदे गटाला धक्का बसला होता. आता आगामी २०२९ च्या निवडणुकीत या पराभवांची परतफेड करण्यासाठी शिंदे गट तयारीला लागला आहे. मुंबईसाठी खास आता ठाणे पॅटर्न लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे (शिंदे गट) निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मुंबईच्या राजकीय रणांगणात ‘मुख्य समन्वयक’ म्हणून सक्रिय झाले आहेत. येत्या १६ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या दोन महिन्यांच्या विशेष मोहिमेत मुंबईतील पक्षसंघटनेची सर्व सूत्रे श्रीकांत शिंदे यांच्या हाती असणार आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे मुंबईच्या राजकारणात ‘ठाणे पॅटर्न’ लागू होणार असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईत ‘शिंदे’ रणनीती: गटबाजीला लगाम आणि भाजपसोबत वाटाघाटी
मुंबईतील विखुरलेली पक्षसंघटना सांधणे आणि अंतर्गत गटबाजी मोडीत काढणे, हे श्रीकांत शिंदे यांच्यासमोरील मुख्य आव्हान असेल. या मोहिमेसाठी राहुल शेवाळे, नीलेश राणे आणि योगेश कदम यांसारख्या आक्रमक नेत्यांची फळी मैदानात उतरवण्यात आली असली, तरी अंतिम निर्णयाचे अधिकार श्रीकांत शिंदे यांच्याकडेच राहतील. भविष्यातील जागावाटपाच्या वेळी भाजपसोबत होणाऱ्या ‘हाय-प्रोफाइल’ वाटाघाटींमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आपल्या आधुनिक कार्यपद्धतीमुळे मुंबईतील तरुण आणि उच्चशिक्षित मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मानस आहे.
१६ मेपासून राज्यव्यापी दौरा…
केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षसंघटना बळकट करण्यासाठी श्रीकांत शिंदे १६ मेपासून राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांपासून होईल. त्यानंतर हा मोर्चा बीड, जालना आणि नांदेड या मराठवाड्याच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांकडे वळणार आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या दोन महिन्यांच्या मोहिमेत ते २२ जिल्ह्यांतील ७० हून अधिक विधानसभा मतदारसंघांना थेट भेट देणार आहेत.
कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्न
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मोठ्या सभांवर भर न देता, १०० हून अधिक मतदारसंघांत जाऊन कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाईल. स्थानिक प्रश्न जागेवरच सोडवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. विशेषतः दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यात संघटना तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि ग्रामीण मतदारांवर पकड घट्ट करणे, हे या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘ठाणे मॉडेल’ आता संपूर्ण राज्यात राबवून शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे
Mumbai,Maharashtra
May 11, 2026 11:25 AM IST
Eknath Shinde : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! श्रीकांत शिंदेंचा २२ जिल्ह्यांचा दौरा आणि मुंबईसाठी ‘ठाणे पॅटर्न’


